
अंबेजोगाई येथे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सदिच्छा भेटीत प्रा. बी. व्ही. मोतीपोवळे यांच्या उपस्थितीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेसच्या विचारसरणीवर राजकारण करत मोठी राजकीय ओळख निर्माण केलेल्या काही नेत्यांनी आता भाजपच्या उमेदवारासाठी सक्रिय प्रचाराची भूमिका घेतल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
माजी मंत्री बसवराज पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करत विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसशी संबंधित मानल्या जाणाऱ्या प्रा. बी. व्ही. मोतीपोवळे यांनी काँग्रेस विचारांच्या लोकांच्या घरी भेटी देत भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी मैदानात उतरणे हे राजकीय नैतिकतेला धरून आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये याबाबत तीव्र नाराजी असून, “जर भाजपच्या उमेदवारासाठी एवढ्याच निष्ठेने काम करायचे असेल तर थेट भाजपमध्ये प्रवेश करून उघडपणे प्रचार करावा. काँग्रेसची ओळख कायम ठेवून भाजपच्या प्रचारासाठी फिरणे म्हणजे कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे,” अशी प्रतिक्रिया काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
राजकीय निरीक्षकांच्या मते, पक्षनिष्ठा आणि वैयक्तिक संबंध यामध्ये स्पष्ट भूमिका घेणे आवश्यक असते. एका बाजूला काँग्रेसचे नाव वापरायचे आणि दुसऱ्या बाजूला भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा, बैठका आणि भेटीगाठी घ्यायच्या, हा दुहेरी राजकीय खेळ असल्याची चर्चा सुरू आहे.

विधान परिषद निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे अनेक नेत्यांचे खरे राजकीय चेहरे समोर येत असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. काँग्रेसच्या विचारांवर राजकीय कारकीर्द घडवून अखेर भाजपच्या उमेदवारासाठी प्रचार करणाऱ्यांना कार्यकर्ते “राजकीय गद्दार” म्हणून पाहू लागल्याचे बोलले जात आहे.
आता प्रा. बी. व्ही. मोतीपोवळे यांनी आपल्या भूमिकेबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करणार का, की काँग्रेसच्या नावाखाली भाजपच्या प्रचाराची मोहीम सुरूच ठेवणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




