१४७ पैकी ८० ग्रीन बेल्टवर अतिक्रमण; ३० उद्याने ओसाड, शहराची फुफ्फुसेच गुदमरली

लातूर : पर्यावरण दिनानिमित्त शहरभर दिंड्या, वृक्षारोपणाचे कार्यक्रम, सोशल मीडियावरील हिरव्यागार पोस्ट आणि पर्यावरण रक्षणाच्या घोषणा सुरू आहेत. मात्र प्रत्यक्ष वास्तव पाहिले तर लातूर शहरातील पर्यावरणाचे चित्र अत्यंत भयावह आहे. शहरातील १४७ ग्रीन बेल्टपैकी तब्बल ८० ग्रीन बेल्टवर अतिक्रमण झाले असून ३० उद्यानांमध्ये एकही झाड शिल्लक नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शहराचा विकास करताना पर्यावरण संवर्धनासाठी राखीव ठेवलेल्या जागांवर आज मंदिरे, समाजमंदिरे, सभागृहे आणि इतर बांधकामे उभी राहिली आहेत. ज्या जागा नागरिकांच्या आरोग्यासाठी, मुलांच्या खेळासाठी आणि शहराच्या पर्यावरणीय समतोलासाठी राखीव होत्या, त्याच जागा आज काँक्रीटच्या जंगलात रूपांतरित झाल्या आहेत.

अधिक धक्कादायक बाब म्हणजे १४७ पैकी केवळ ३७ ग्रीन बेल्ट सुस्थितीत आहेत. उर्वरित ठिकाणी वॉकिंग ट्रॅक तुटलेले, कंपाउंड वॉल ढासळलेल्या, झाडे नष्ट झालेली आणि मोकाट जनावरांचा मुक्त संचार सुरू आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहराची फुफ्फुसेच गुदमरू लागली आहेत.
महानगरपालिकेकडे उद्यानांच्या देखभालीसाठी २९० कर्मचाऱ्यांची गरज असताना प्रत्यक्षात केवळ ६ कर्मचारी उपलब्ध आहेत. अनेक वर्षांपासून पदभरतीचा प्रस्ताव शासनाकडे धूळ खात पडला आहे. मग शहरातील हरित पट्टे वाचविण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

पर्यावरण दिनाच्या निमित्ताने दरवर्षी लाखो रुपयांची वृक्षारोपण मोहीम राबवली जाते. रोपे लावली जातात, छायाचित्रे काढली जातात, प्रसिद्धीपत्रके झळकतात. मात्र आधीपासून अस्तित्वात असलेले ग्रीन बेल्टच नामशेष होत असतील, तर ही सारी धावपळ केवळ कागदी पर्यावरणवाद नाही का?
आयुक्त महोदय, प्रश्न थेट आहे…
पर्यावरण दिनाच्या दिंड्या काढून, सोशल मीडियावर पोस्ट टाकून आणि वृक्षारोपणाचे फोटो प्रसिद्ध करून शहर हिरवेगार होत नाही. लातूरचे गायब झालेले ८० ग्रीन बेल्ट परत ताब्यात घेण्यासाठी कारवाई कधी होणार? पर्यावरणासाठी राखीव जागांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम कधी सुरू होणार? आणि शहराची फुफ्फुसे असलेल्या या जागा पुन्हा नागरिकांच्या स्वाधीन कधी होणार?
लातूरकरांना आता घोषणांची नाही, तर कृतीची अपेक्षा आहे. अन्यथा पर्यावरण दिन हा केवळ एक दिवसाचा उत्सव आणि उर्वरित वर्षभर पर्यावरणाच्या हत्येचा मूक साक्षीदार ठरत राहील.




