
लातूर/निलंगा (प्रतिनिधी)
लातूर जिल्ह्यातील निटूर परिसरात घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली असून, सामान्य नागरिकावर केवळ गावातील व्यक्तींनीच नव्हे तर पोलिसांनीही अमानुष मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, तक्रार देण्यासाठी गेलेल्या पीडिताला उलट जीवघेण्या धमक्या दिल्याचा आरोप असल्याने संपूर्ण प्रकरणाने खळबळ उडाली आहे.

निलंगा तालुक्यातील बुजरूगवाडी येथील आनंद हरी जाधव (वय ३१) यांनी दिलेल्या अर्जानुसार, ९ मार्च रोजी सायंकाळी निटूर बाजारात खरेदी करत असताना विकास पाटील व त्याच्या चार साथीदारांनी त्यांचा पाठलाग करत जातिवाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, संबंधितांनी पोलिसांना बोलावून जाधव यांना पोलिस ठाण्यात नेल्याचा आरोप आहे.

यानंतर घडलेली बाब अधिक गंभीर आहे. पोलिस ठाण्यातच हेड कॉन्स्टेबल सुधीर शिंदे, लक्ष्मण तुकाराम कांबळे उर्फ पप्पू, तसेच इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिक पोलिस पाटील विलास पाटील यांनी जाधव यांना हात बांधून, पायावर उभे ठेवून बाभळीच्या काठीने आणि लाथा-बुक्क्यांनी रात्री उशिरापर्यंत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. “बेशुद्ध होईपर्यंत मारहाण झाली,” असा धक्कादायक दावा अर्जात करण्यात आला आहे.

तक्रार द्यायला गेल्यावर नकार — न्याय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेल्या जाधव यांनी उपचारासाठी दवाखान्यात धाव घेतली. मात्र, सरकारी रुग्णालयात ‘पोलिस पत्र’ नसल्याने उपचारास विलंब झाला. पीडिताच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता, तक्रार नोंदवण्यास नकार देण्यात आल्याचा आरोप आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, न्यायव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे.

“तक्रार केली तर ठार मारू” — पुन्हा धमकी
इतकेच नव्हे, तर १३ मार्च रोजी केळगाव जंगल परिसरात पुन्हा संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांनी जाधव यांना बोलावून “तक्रार केली तर ठार मारू” अशी उघड धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे पीडित व त्याचे कुटुंब भीतीच्या छायेत जगत आहे.
दरम्यान, जाधव यांनी लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय तपासणी केली असून, MLC अहवालही नोंदवण्यात आला आहे.
सामाजिक संताप उसळण्याची चिन्हे
घटनेतील जातिवाचक शिवीगाळ, पोलिसांचा कथित सहभाग आणि तक्रार दाबण्याचा प्रयत्न या सर्व बाबी अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आहेत. मानवाधिकार आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीने हा प्रकार संतापजनक असून, संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी होत आहे.
न्याय कोण देणार?
ज्यांच्या हातात कायदा अंमलबजावणीची जबाबदारी आहे, त्यांच्यावरच असे आरोप होत असतील, तर सामान्य नागरिकाने न्यायासाठी कुणाकडे धाव घ्यायची, असा सवाल उपस्थित होत आहे.
आता सर्वांचे लक्ष लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लागले आहे. या प्रकरणात निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी भटक्या विमुक्त संघटनेचे प्रदेश अध्यक्ष हरीभाऊ गायकवाड यांनी केली आहे..
