
लातूर | विशेष प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिकेच्या प्रशासनात नेमकं काय सुरू आहे, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता या महत्त्वाच्या पदावर कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याला प्रतिनियुक्तीने कारभार देण्याचा प्रयत्न सुरू असल्याने प्रशासनातील नियमबाह्य कारभारावर शहरात तीव्र चर्चा रंगली आहे.

महानगरपालिकेच्या आस्थापना विभागाकडून नगर विकास विभागाला पाठविण्यात आलेल्या पत्रानुसार श्री. विजयकुमार सुभाष चव्हाण यांना कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा) या पदावर प्रतिनियुक्तीने मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र या मागणीमुळे सेवा प्रवेश नियम, पदोन्नतीची पात्रता आणि प्रशासकीय श्रेणी याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सेवाप्रवेश नियम काय सांगतात?
नगर विकास विभागाच्या १९ सप्टेंबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार तसेच लातूर शहर महानगरपालिका सेवा प्रवेश व वर्गीकरण नियम २०१९ नुसार –
- कार्यकारी अभियंता पद पदोन्नतीने भरणे अपेक्षित आहे.
- पदोन्नतीसाठी उप अभियंता किंवा शाखा अभियंता ही श्रेणी आवश्यक असते.
- पदोन्नतीस पात्र अधिकारी उपलब्ध नसल्यासच प्रतिनियुक्ती हा पर्याय वापरता येतो.
मात्र प्रत्यक्षात कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याच्या हाती थेट कार्यकारी अभियंत्याचा कारभार देण्याचा प्रयत्न होत असल्याने नियमांचा भंग होत असल्याचा आरोप केला जात आहे.
कनिष्ठ पदावरून थेट वरिष्ठ पदावर?
सदर अधिकारी मूळत: लोखा नगरपालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर येत आहे. डिप्लोमा पात्रतेवर कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्याकडे लातूरसारख्या मोठ्या शहराच्या पाणीपुरवठ्याचा कारभार देण्याचा प्रस्ताव आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याहूनही गंभीर बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वी आंबेजोगाई येथे बदलीचे आदेश निघाल्याची चर्चा होती. मात्र ते आदेश अचानक गायब झाल्याचे सांगितले जात असून आता पुन्हा त्याच अधिकाऱ्याला कार्यकारी अभियंता पदावर ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा मनपेत रंगली आहे.

अमृत 2.0 आणि भुयारी गटार योजनांवर प्रश्न
सध्या लातूर शहरात अमृत 2.0 अंतर्गत पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार प्रकल्प आणि उन्हाळ्यातील पाणीटंचाई व्यवस्थापन ही मोठी कामे सुरू आहेत. अशा वेळी अनुभव नसलेल्या अधिकाऱ्याच्या हाती विभाग देणे म्हणजे कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्रशासनात गोंधळाचे चित्र
मनपात सध्या प्रशासकीय पदांबाबतही मोठी विसंगती असल्याची चर्चा आहे.
- सहाय्यक आयुक्त उपायुक्त म्हणून काम पाहत आहेत
- शिक्षक दर्जाचे कर्मचारी श्रेणी-१ अधिकाऱ्यांचे काम करत आहेत
- कनिष्ठ अभियंत्याकडे कार्यकारी अभियंत्याचा कारभार
यामुळे प्रशासनातील अधिकार आणि जबाबदाऱ्या यांचा संपूर्ण गोंधळ उडाल्याचे बोलले जात आहे.
‘सूत्रधार’ कोण?
दरम्यान, या संपूर्ण कारभारामागे विभाग प्रमुख म्हणून काम पाहणारे डॉ. पंजाबराव खानसोळे पाटील यांचे नाव चर्चेत असल्याचे मनपात बोलले जात आहे. काही सूत्रांच्या मते, आयुक्तांनाही पूर्ण माहिती न देता प्रतिनियुक्तीचे आदेश काढले गेल्याचा आरोप केला जात आहे.
मात्र याबाबत अधिकृतरीत्या कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
आयुक्तांकडून शासनाला विनंती
महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती मानसी (भाप्रसे) यांनी नगर विकास विभागाला पाठविलेल्या पत्रात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी
- सद्य अधिकाऱ्याला मुदतवाढ द्यावी
किंवा - इतर अभियंत्याची प्रतिनियुक्ती करावी
अशी विनंती केली आहे.
नागरिकांचा सवाल
लातूरकरांचा प्रश्न मात्र सरळ आहे –
नियम मोडून प्रशासन चालणार का?
कोट्यवधी रुपयांच्या योजनांचा कारभार पात्र अधिकाऱ्यांकडे द्यावा, अन्यथा भविष्यातील जबाबदारी कोण घेणार?
