
उपाध्यक्षपदी दयानंद सूर्यवंशी यांची निवड
लातूर | प्रतिनिधी :
लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी दयानंद सूर्यवंशी यांचीही बिनविरोध निवड झाल्याने जिल्हा परिषदेत नवीन नेतृत्वाची अधिकृत घोषणा झाली.
जिल्हा परिषद सभागृहात आज पार पडलेल्या विशेष सभेत अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदासाठी उषाताई पाटील तळेगावकर यांचे नाव प्रस्तावित करण्यात आले होते. त्यांच्या विरोधात कोणतीही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली.
त्यानंतर उपाध्यक्षपदासाठी दयानंद सूर्यवंशी यांचे नाव पुढे आले. त्यांच्याविरोधातही कोणतीही उमेदवारी नसल्यामुळे त्यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.
निवड जाहीर होताच जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात दोन्ही नेत्यांचे अभिनंदन केले. यावेळी उपस्थित सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
नवीन अध्यक्ष उषाताई पाटील तळेगावकर यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले की,
“जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा विकास, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य आणि रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधांवर विशेष भर दिला जाईल. सर्व सदस्यांना सोबत घेऊन विकासकामे गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील.”
उपाध्यक्ष दयानंद सूर्यवंशी यांनीही जिल्ह्यातील विकासकामांना प्राधान्य देत प्रशासन व सदस्यांमध्ये समन्वय साधून काम करण्याची ग्वाही दिली.
या निवडीमुळे लातूर जिल्हा परिषदेच्या नेतृत्वात नव्या पर्वाची सुरुवात झाली असून आगामी काळात ग्रामीण विकासाच्या विविध योजनांना अधिक वेग मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
