डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री मा. ना. पंकजाताई मुंडे यांची घेतली भेट

लातूर शहर आणि परिसरातील वाढत्या पर्यावरणीय समस्यांसह पशुवैद्यकीय सुविधांच्या अभावावर तातडीने कार्यवाही व्हावी, या मागणीसाठी आज मंत्रालय, मुंबई येथे सामाजिक कार्यकर्त्या व पशुवैद्यकीय क्षेत्रातील जाणकार डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व वातावरण बदल आणि पशुसंवर्धन मंत्री मा. ना. पंकजाताई मुंडे यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान लातूरमधील दोन अत्यंत महत्त्वाच्या व गंभीर प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली आणि संबंधित निवेदन मा. मंत्र्यांना सादर करण्यात आले.
लातूर MIDC परिसरातील दूषित पाण्याचा प्रश्न
डॉ. पाटील यांनी निदर्शनास आणून दिले की, मौजे हरंगुळ (बु.) येथील मंदार वस्ती आणि वरवंटी (बसवंतपूर) येथे लातूर औद्योगिक वसाहतीतून (MIDC) मोठ्या प्रमाणात केमिकलयुक्त दूषित पाणी नाल्याद्वारे थेट रहिवासी वस्तीत शिरत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना विविध प्रकारच्या आरोग्यविषयक तक्रारींना सामोरे जावे लागत आहे.
या समस्येचे गांभीर्य लक्षात घेता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अंतर्गत संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित कार्यवाही करावी आणि दूषित पाण्याच्या विल्हेवाटीकरिता यंत्रणा विकसित करावी, अशी मागणी त्यांनी केली.

लातूर जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयातील अडचणी
लातूर येथील पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयात सध्या विविध मूलभूत सुविधा नाहीत आणि अनेक पदे रिक्त असल्यामुळे शेतकरी व पशुपालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. अर्चनाताईंनी पुढील मुद्द्यांचा ठामपणे मागोवा घेतला:
- बंद असलेले IPD विभाग तातडीने सुरू करावा.
- जून २०२३ मध्ये मंजूर करण्यात आलेल्या अद्ययावत पशुरोग निदान प्रयोगशाळेचे काम त्वरीत सुरू करावे व निधी वितरित करावा.
- इमर्जन्सी वॉर्डची निर्मिती करावी, जेणेकरून अपघातग्रस्त जनावरांवर त्वरित उपचार होऊ शकतील.
- शिपाई व खाजगी सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जावी.
- निवासी वैद्यकीय अधिकारी पदे तातडीने भरली जावीत.
- थ्री-फेज वीज कनेक्शन नसल्यामुळे बंद असलेले सोनोग्राफी यंत्र त्वरित कार्यान्वित करावे.
- Blood Biochemistry तपासण्या (LFT, KFT) दवाखान्यात उपलब्ध करून द्याव्यात.
या सर्व मागण्यांवर मा. पंकजाताई मुंडे यांनी संपूर्ण गांभीर्याने लक्ष दिले व लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असल्याचे डॉक्टर अर्चनाताईंनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
लातूरसारख्या ग्रामीण जिल्ह्यात शाश्वत पर्यावरणीय धोरण आणि पशुवैद्यकीय व्यवस्थेचा बळकटीकरण होणे गरजेचे असून, यासाठी अशा प्रयत्नांना धोरणात्मक पातळीवर समर्थन मिळणे ही काळाची गरज असल्याचे मत सामाजिक क्षेत्रात या भेटीबद्दल व्यक्त होत आहे.
