पुणे-
केवळ शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या घटून 10 ते 15 टक्के राहिली आहे. तरीही तेवढ्याच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, जेवढ्या 50 ते 60 टक्के शेतकरी शेतीवर अवलंबून होते. याचा अर्थ असा की, केवळ शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबावरील संकट अधिक वाढले आहे. म्हणून या वर्षी किसानपुत्रांनी 19 मार्चला अन्नत्याग करून संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे आवाहन किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी केले आहे.

प्रतिकुटुंब 18 हजार द्या
ज्या कुटुंबात शेतीबाह्य उत्पन्न येऊ लागले, त्या कुटुंबातील आत्महत्या टळल्या आहेत असे दिसून येते. केवळ शेतीवर अवलंबून राहिलेल्या 10-15 टक्के शेतकऱ्यांच्या कुटुंबात शेतीबाह्य उत्पन्न कसे येईल याचा तातडीने विचार केला पाहिजे. सरकारी कर्मचाऱयांच्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यासाठी 18 हजार रुपये महिना ठरवले आहे, तसे 18 हजार रुपये महिन्याला या कुटुंबांना पोचविण्याची तरतूद सरकारने करावी. यासाठी इतर अनुदाने आणि योजना बंद करावी लागली तर ती बंद करावी, अशी सूचना किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी केली आहे.
विशेष अधिवेशन बोलवा
संपूर्ण महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या साहेबराव करपे कुटुंबाच्या सामूहिक आत्महत्येला 19 मार्च रोजी 39 वर्षे होतात. या काळात लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. परंतु लोकसभा व विधान सभेत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजलीचा अर्पण करणारा सादर ठराव देखील करण्यात आला नाही. राज्यकर्ते शेतकऱ्यांच्या प्रती संवेदना शून्य झाले आहेत.
19 मार्च हा शेतकारी सहवेदना दिवस आहे, या दिवशी लोकसभा- विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे. आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करून शेतकरी आत्महत्या होणार नाहीत, यासाठी उपाययोजना करावी, असे आवाहन अमर हबीब यांनी केले. त्यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या सभापतींना तसे पत्रही पाठविले आहे.
ग्रामपंचायतीचे ठराव
लोकसभा-विधानसभा दखल घेईल की नाही, हे आज सांगता येत नाही, तरी आज गावो गावच्या ग्रामपंचायती, ग्रामसभांनी ‘आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांना श्रद्धाजली’ अर्पण करणारा ठराव करून महाराष्ट्र विधानसभेचे सभापती, मुख्यमंत्री यांना पाठवावे, अशी सूचना त्यांनी केली आहे.
ठरावांचा मसुदा-
19 मार्च 1986 रोजी साहेबराव करपे कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली होती. त्यानंतर महाराष्ट्रात दररोज 5 ते 7 शेतकरी आत्महत्या करीत आहेत. आत्महत्या करून जीव देणे भाग पडलेल्या तमाम शेतकऱ्यांना ही सभा श्रद्धांजली अर्पण करून सहवेदना व्यक्त करीत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या तात्काळ थांबाव्यात यासाठी उपाययोजना करण्याची मागणी ही सभा करते.
उमरा येथे अन्नत्याग
19 मार्च रोजी, अमर हबीब व त्यांचे सहकारी नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील उमरा या गावात अन्नत्याग करणार आहेत.
या गावच्या भीमराव सिरसाट या शेतकऱ्याने काही वर्षांपूर्वी तहसील कार्यालयात फाशी घेऊन आत्महत्या केली होती.
या गावात दुपारनंतर सहवेदना सभा होईल, अशी माहिती अमर हबीब यांनी दिली.

