
बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर गावाने पुन्हा एकदा धर्म, जात आणि पंथाच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा झेंडा उंचावला आहे. गेल्या २०० वर्षांपासून साजरी केली जाणारी मलिक साहेब यात्रेची परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली. विशेष म्हणजे या यात्रेत हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्र येऊन भाईचाऱ्याचे, ऐक्याचे आणि सौहार्दाचे अप्रतिम दर्शन घडवतात.

यात्रेच्या सुरुवातीला पैठण येथून कावड यात्रा घेऊन आलेले भाविक गावातून ढोलताशांच्या गजरात वाजतगाजत मिरवणूक काढतात. भगवा आणि हिरवा झेंडा एकत्र फडकावत, मलिक साहेब, संत वामनभाऊ महाराज, संत भगवान बाबा आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकावर एकाच कलशातील पाण्याने जलाभिषेक केला जातो. ही महाराष्ट्रातील एकमेव आणि प्रेरणादायी परंपरा पिंपळनेरमध्ये आजही जपली जाते.

या यात्रेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, हिंदू-मुस्लिम महिला एकमेकींना पेढे भरवून, गळाभेट घेत माणुसकीचे दर्शन घडवतात. गावात कोणतीही जात, धर्म किंवा भेदभाव न करता सर्वजण एकत्र येऊन यात्रा साजरी करतात. पारंपरिक लेझीम पथकात दोन्ही समाजातील तरुण मोठ्या आनंदाने सहभागी होतात.
मलिक साहेब यांच्या दर्ग्यावर जलाभिषेक करून, चादर अर्पण करत यात्रेला सुरुवात होते. यात्रेसाठी राज्यभरातून हजारो भाविक पिंपळनेरमध्ये दाखल होतात, आणि गावातले हे सामंजस्य आणि ऐक्य पाहून प्रत्येकाच्या मनात समाधान आणि आश्चर्याचे भाव उमटतात.
पिंपळनेर हे गाव केवळ धार्मिक यात्रेसाठीच नव्हे, तर माणुसकी, एकोपा आणि सामाजिक सलोख्याचे प्रतीक ठरले आहे.
