
दिनांक ०५ जून , १०२५ रोजी विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र मोहोळ द्वारे बारलोणी तालुका माढा येथे शेतकरी शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आधुनिक कृषि तंत्रज्ञान आणि खरीप हंगाम पूर्व नियजण प्रसारासाठी विकसित कृषी संकल्प अभियान दि. २९ मे ते १२ जून २०२५ या दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पोहोचवण्याचे काम महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र मोहोळ, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर, राष्ट्रीय भरड धान्य संशोधन संस्था, सोलापूर यांच्यामार्फत केले जात आहे. आज माढा तालुक्यातील बारलोणी येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विषयाचे विषय विशेषज्ञ श्री. दिनेश क्षिरसागर यांनी कृषि मालाचे मूल्यवर्धन, ज्वारी प्रक्रिया, दुग्ध प्रक्रिया, मसाले उद्योग, फळे व भाजीपाला निर्जलीकरण उद्योग, कडधान्य प्रक्रिया, प्रक्रिया उत्पादनांचे पॅकिंग, लेबलिंग, ब्रॅंडिंग आणि प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना, महिला बचत गट सदस्यांसाठी बीज भांडवल सुविधा आणि महिला अन्न प्रक्रिया लघु उद्योगाची सुवर्णसंधी याविषयी सविस्तर माहिती दिली.
डॉ. परशुराम पात्रोटी, वरिष्ठ शास्त्रज्ञ, केंद्रीय भरड धान्य संशोधन संस्था, सोलापूर यांनी भरड धान्याचे पौष्टिक तत्त्वे, विकसित वाण, बियाण्यांची उपलब्धता, लागवड तंत्रज्ञान याविषयी सविस्तर माहिती दिली. डॉ. शिल्पा परशुराम यांनी डाळिंब पिकातील तेल्या रोग व डाळिंबामध्ये येणारा मर रोग याबद्दल शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी आणि त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व प्रतिबंधात्मक उपाय याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
पीक संरक्षण विषयाचे विषय विशेषज्ञ डॉ. पंकज मडावी यांनी बीज प्रक्रिया, खरीप हंगामातील कीड व रोग व्यवस्थापन, AI आधारित फेरोमॅन ट्रॅप्स अशा विविध नवीन तंत्रज्ञानाबद्दल शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.
याप्रसंगी बारलोणी चे मंडळ कृषि अधिकारी श्री हणमंत बोराटे, उप कृषि अधिकारी श्री बाबू खरात, सहायक कृषि अधीकारी श्री. राजेंद्र गोपने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री सुयोग ठाकरे आदींचे सहकार्य लाभले.

