
आधुनिक कृषि तंत्रज्ञान आणि खरीप हंगाम पूर्व नियोजन प्रसारासाठी विकसित कृषी ‘संकल्प अभियान दि. २९ मे ते १२ जून २०२५ या दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये कृषि संशोधन विस्ताराचे कार्य महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र मोहोळ, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर, राष्ट्रीय भरड धान्य संशोधन संस्था, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने केले जात आहे.

या अभियानाच्या नवव्या दिवशी माळशिरस तालुक्यातील माळीनगर येथील द सासवड माळी शुगर फँक्टरी लिमिटेड येथील सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमा दरम्यान उपस्थित शेतकऱ्यांना डॉ. गणेश पवार (ऊस कृषी विद्यावेत्ता) यांनी ऊस लागवडीचे अर्थशास्त्र, बेणे प्रक्रिया व बेणे निवड, सरीतील अंतर, तण व्यवस्थापन, जमीनीचे आरोग्याचे व अंतर पिकाचे महत्त्व या बाबीच्या माध्यमातून सखोल असे मार्गदर्शन केले.

त्यानंतर डॉ. परशुराम पात्रोटी, वरिष्ठ शास्त्रज्ञ, केंद्रीय भरड धान्य संशोधन संस्था, सोलापूर यांनी भरड धान्याचे उत्पादनातून शाश्वत शेती व आरोग्याकडे वाटचाल करावी असे आवाहन केले. डॉ. शिल्पा परशुराम यांनी डाळिंब पिकातील तेल्या रोग व डाळिंबामध्ये येणारा मर रोग याबद्दल मार्गदर्शन केले. अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विषयाचे विषय विशेषज्ञ श्री. दिनेश क्षिरसागर यांनी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना याविषयी सविस्तर माहिती दिली. पीक संरक्षण विषयाचे विषय विशेषज्ञ डॉ. पंकज मडावी यांनी खरीप हंगामातील कीड व रोग व्यवस्थापन अशा विविध नवीन तंत्रज्ञानाबद्दल शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी आणि माती व पाणी परीक्षण आधारित खत व्यवस्थापन याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना मृद विज्ञान व कृषि रसायन शास्त्रं विषयाचे विषय विशेषज्ञ श्रीमती काजल जाधव म्हात्रे यांनी मार्गदर्शन दिली. ड्रोन द्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक इफको कंपनी सोलापूर यांच्या मार्फत घेण्यात आले.
याप्रसंगी द सासवड माळी शुगर लिमिटेड चे अध्यक्ष श्री. गणेश इनामके, उपाध्यक्ष श्री. कपिल भोंगळे, श्री. निखिल कुदळे (उस विकास अधिकारी), आत्मा माळशिरसचे रेशमा क्षीरसागर आणि सूरज फुले, सहायक कृषि अधिकारी सारिका एखातपुरे आणि भागवत शिंदे, इफको चे धाइंजे, सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री सुयोग ठाकरे आदींचे सहकार्य लाभले.

