दि. ७, आ. मनिषा कायंदे यांनी विधान परिषद सभागृहात, पंढरीच्या वारीत अर्बन नक्षली शिरले आहेत, असा बिनबुडाचा आरोप करतांना संविधान दिंडी, पर्यावरण दिंडी आणि अन्य दिंड्यांचा उल्लेख केलेला आहे. त्यांनी केलेला आरोप संविधानिक मूल्यांचा अवमान करणारा आहेच, ही सांविधानिक मूल्ये संतांच्या विचारांवरच आधारित असल्याने त्यांचाही अवमान करणारी आहे. महा. अंनिस आ. मनिषा कायंदे यांच्या विधान परिषदेत मत व्यक्त करण्याचा अधिकाराचा आदर करून त्यांनी हे वक्तव्य करताना या अधिकाराचा दुरुपयोग केला आहे हे नमूद करीत आहे आणि त्यांच्या वरील वक्तव्या चा तीव्र जाहीर निषेध करीत आहे. त्या वारीत किती वेळा किती वर्षात गेलेल्या आहेत ? त्यांनी केलेल्या भाषणातील विसंगती जनतेच्या निदर्शनास आणून देत आहोत.
या दिंडीत सामील होणारे लोक देवाला न मानणारे, नास्तिक संघटनांचे आहेत असा आरोप त्यांनी कोणत्या आधारे केला आहे. ते नास्तिक आहेत याचे सप्रमाण कोणतेही पुरावे दिले नाहीत. संविधान दिंडीत महा. अंनिसचे कार्यकर्ते सामील असतात. होय असतात. महा. अंनिस च्या पंचसूत्रीत संत समाजसुधारकांच्या कृतिशील विचाराचा वारसा आणि भारतीय संविधानाची मूल्ये जनसामान्यांपर्यंत पोचवणे हे मूलभूत सूत्र स्वीकारून या संघटनेत सर्व धर्मांचे, पंथांचे, विविध विचारांना मानणारे लोक आहेत. सांविधानिक मूल्यांना आदर्श मानणारी महा. अंनिस जनतेच्या देव-धर्म-श्रद्धा विषयक मूलभूत अधिकारांचा आदर करते. अशा कार्यकर्त्यांना किंवा नास्तिकांना वारीत सामील होण्यास बंदी असल्याचा काही परंपरागत नियम किंवा फतवा नाही. संतांनी आपल्या काळात प्रस्थापित असलेल्या जातीप्रथेविरोधात, अन्य अनिष्ट प्रथांविरोधात जाऊन समतेची, बंधुभावाची, विवेकाची वैश्विक मूल्ये लोकांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला. तीच मूल्ये वारकरी संप्रदायाने अनुसरली आणि तीच मूल्ये संविधानात आलीत. महा. अंनिस सुद्धा संतांच्या याच विचारांचा वारसा पुढे घेऊन जात आहे आणि संविधान दिंडीत गेली सात वर्षापासून सामील होत आहे. आमचे कार्यकर्ते ‘देव मानू नका’ अशी मांडणी कधीही करीत नाहीत आणि या दिंडी मार्फत देखील करीत नाहीत. वारीत तसे काही केल्याचा कोणताही पुरावा आ. मनिषा कायंदे यांनी दिलेला नाही. या दिंडीत सामील असणारे कीर्तनकार ह .भ.प. श्यामसुंदर सोन्नर महाराज, ह.भ.प. संत ज्ञानेश्वर संजीवन समाधीचे चोपदार महाराज, वाबळे महाराज, बंडगर महाराज, हरिदास तम्मेवार महाराज यांचेसह विविध विवेकवादी, संघटना, संस्थांचे जबाबदार पदाधिकारी, पर्यावरणाची काळजी घ्या असे सांगणारे पर्यावरणवादी, संतांच्या विचारांवर निष्ठा असलेले वारकरी हे यांना कोणत्या अंगाने अर्बन नक्षली वाटत आहेत?
इतिहास साक्ष देत आहे की संतांनी आपल्या काळात जातीप्रथेविरोधात तसेच अन्य अनिष्ट प्रथंविरोधात जाऊन प्रस्थापितांविरोधात बंड केले. त्यांनी समतेची, बंधुभावाची, विवेकाची वैश्विक मूल्ये लोकांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला. म्हणून ते संत ठरले. तीच मूल्ये संविधानाने स्वीकारलेली आहेत हे वास्तव नाकारता येत नाही. हे सांगितले तर ते सांगणार्यास थेट अर्बन नक्षली म्हणून हिणवताना या संतांच्या मूल्यांनाच आपण अर्बन नक्षलींच्या रांगेत आणून बसवत आहोत हे मनीषा कायंदे यांच्या लक्षात कसे येत नाही? याचे आश्चर्य वाटते. हा संविधानाचा अवमान आहे. समता, बंधुता, विवेक ही या आधी धर्माला मान्य नसलेली, संतांनी रुजवलेली आणि नंतर संविधानात आलेली मूल्ये लोकांना समजावून सांगितली तर त्यास ह्या कायंदे बुद्धिभेद करणे असे म्हणतात. ते कशाच्या आधारावर? उलट लोकांचा बुद्धिभेद करून संतविचारांपासून लोकांना दूर करून सनातनी विचाराकडे ढकलत आहेत असे म्हणावे लागेल.
मनीषा कायंदे म्हणतात लवकरच येऊ घातलेले विशेष जनसुरक्षा विधेयक हे अशा गोष्टींना अटकाव करण्यासाठीच आहे. हे सभागृहात जाहीर करून या काळ्या मनुवादी विध्येयकाचा छुपा उद्देश त्यांनी उघड केला आहे. या विधेयकाच्या रूपाने संविधानाच्या रक्षणासाठी लढणार्या कार्यकर्त्यांच्या आणि संघटनांच्या समोर कोणते ताट वाढून ठेवले आहे याची कल्पना येते. म्हणूनच या जनसुरक्षा कायद्यास महा. अंनिसने विरोध नोंदवला आहे.
मनिषा कायंदे यांनी विधान परिषदेमध्ये त्यांच्या विधानाबद्दल जाहीर माफी मागावी अशी मागणी करते आहे.

