
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र
लातूर, दि. २३ जुलै २०२५: मराठवाड्यात वीज वितरण यंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. त्यामुळे सर्व वीज ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा देण्याच्या सेवेत कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही असा इशारा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी दिला. अचूक बिलिंगसाठी नादुरुस्त व सदोष व वीजमीटर तातडीने बदलण्यात यावेत तसेच प्रत्येक महिन्याला वसूलीचे उदिदष्ट १०० टक्के पूर्ण करावे असे निर्देश त्यांनी बुधवारी (दि. २३) दिले.
येथील शासकीय विश्रामगृहात छत्रपती संभाजीनगर, नांदेड व लातूर परिमंडलातील विविध कामे व योजनांसह प्रामुख्याने मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.०, मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेचा श्री लोकेश चंद्र यांनी आढावा घेतला. यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक श्री. आदित्य जिवने, संचालक (संचालन/प्रकल्प) श्री. सचिन तालेवार, संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार, कार्यकारी संचालक श्री. प्रसाद रेशमे व श्री. धनंजय औंढेकर, मुख्य अभियंते सर्वश्री अरविंद बुलबुले (लातूर), पवनकुमार कछोट (छ. संभाजीनगर), राजाराम माने (नांदेड) यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र म्हणाले, मराठवाड्यात विविध योजनांद्वारे प्रामुख्याने औद्योगिक वसाहती परिसरांसह शहरी व ग्रामीण भागात वीज वितरण यंत्रणेचे जाळे भक्कम करण्यात येत आहेत. ही कामे गतिमान व दर्जेदार होतील याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा करणे महावितरणची जबाबदारी आहे. यामध्ये कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही. काही कारणांनी वीज पुरवठा खंडित झाल्यास प्रथम पर्यायी स्वरूपात तसेच दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करून खंडित विजेचा कालावधी कमीत कमी राहील याची दक्षता घ्यावी असे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, महावितरणचे अस्तित्व हे वीजबिलांच्या महसूलावरच अवलंबून आहे. गेल्या तीन चार महिन्यांमध्ये महसूलाच्या उद्दिष्टाप्रमाणे बिलांची वसूली झालेली नाही, ही गंभीर बाब आहे. महावितरणच्या आर्थिक स्थैर्यासाठी वीजबिल वसूलीशिवाय अन्य पर्याय नाही. थकबाकी व चालू वीजबिलांचे उद्दिष्ट दरमहा पूर्ण करावे. तसेच जुन्या नादुरुस्त किंवा सदोष वीजमीटरमुळे महावितरण व ग्राहकांना आर्थिक फटका बसतो. असे जुने मीटर तातडीने बदलण्यात यावेत.
घरगुती ग्राहकांचे वीजबिल शून्यवत करणारी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना, मागेल त्यांना सौर ऊर्जा कृषिपंप आदी प्रभावी अंमलबजावणी करणे व ग्राहकांना लाभ मिळवून देणे हे महावितरणमधील प्रत्येकाचे कर्तव्य आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेद्वारे सौरग्राम योजनेला मोठे पाठबळ मिळत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या सहकार्याने या योजनेला आणखी गती द्यावी. स्वातंत्र्यदिनाच्या ग्रामसभांमध्ये या योजनेची माहिती द्यावी. गावागावांमध्ये प्रबोधन करावे अशी सूचना श्री. लोकेश चंद्र यांनी केली.
उद्योजकांकडून समाधान व्यक्त– आढावा बैठकीनंतर महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी स्थानिक उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी वीजसेवा व प्रश्नांबाबत चर्चा झाली. पूर्वीच्या तुलनेत सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा होत असल्याचे नमूद करीत उद्योजकांनी समाधान व्यक्त केले.
