
लातूर : रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे उदगीर तालुक्यातील बोरगाव आणि धडकनाळ गावांमध्ये मोठं नुकसान झालं आहे. जनजीवन विस्कळीत झालं असून,महावितरणच्या वीजयंत्रणेलाही मोठा फटका बसला. महावितरणकडून परिस्थिती पूर्ववत आणण्यासाठी पडत्या पावसातही युद्धपातळीवर प्रयत्न करून अखेर आज दुपारी साडेचार वाजता दोन्ही गावांचा वीजपुरवठा पुर्ववत करण्यास यश मिळाले आहे.
रविवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे बोरगाव आणि धडकनाळ गावात लेंडी नदीला पूर आला होता. त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं सोबतच महावितरणचे वीज खांब, डीपी (रोहीत्र) कोसळले. यामुळे रविवारपासूनच ही दोन्ही गावं अंधारात होती. गेल्या तीन दिवसांपासून महावितरणच्या उदगीर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री महाद्वार यांच्यासह सर्व कर्मचारी वीज खांब आणि डीपी पुन्हा उभा करण्याचं काम अहोरात्र करत होते. मात्र, या दोन गावांना नांदेड जिल्हयातील मुक्रमाबाद उपकेंद्रातून वीजपुरवठा होतो. मुक्रमाबाद आणि परिसरातही जोरदार पाऊस झाल्यामुळे तिथेही विजेचे खांब कोसळले होते. त्यामुळे वीज जोडणीमध्ये अडथळे येत होते. महावितरणच्या लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले, अधीक्षक अभियंता प्रशांत दाणी हे जातीने सर्व कामावर लक्ष ठेवून होते. वीजपुरवठा लवकर पुर्ववत व्हावा यासाठी नांदेड जिल्हयातील महावितरणच्या अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात होते. आज अखेर दुपारी या परिश्रमाला यश प्राप्त झाले असून बोरगाव व धडकनाळ गावांचा विभाग वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

