ना किर्तनाचे शिक्षण ना संगिताचे धडे गिरवलेले पण किर्तन भुषण पदवीने सन्मानित ह.भ.प. रामदास शास्ञी चाकूरकर*
अभय मिरजकर
कधी तरी किर्तन ऐकले एवढ्यापुरताच किर्तनाचा संबंध आलेला, गाणी ऐकलेली एवढाच संगीताचा संबंध आलेला, असे असताना आपल्या पुर्वजांच्या चालत आलेल्या परंपरेची जोपासना करण्यासाठी, त्यांचे साहित्य सर्वांसमोर आणण्यासाठी चाकूर येथील रामदास भानुदास शास्ञी यांनी केलेले कार्य एखाद्या नाटक अथवा चिञपटातील कथानकाप्रमाणे किंवा एखाद्या परिकथेतील गोष्टी प्रमाणेच वाटते. तीन वर्षांच्या काळात तब्बल १४३ नारदीय किर्तन तर केलेच पण किर्तन भुषण पुरस्काराने गौरवण्यातही आले. महाराष्ट्रातील अनेक महत्त्वपूर्ण ठिकाणी किर्तन सेवा करता आली हे आपले भाग्यच आणि गुरु महाराजांचा आशीर्वाद अशी कृतज्ञतेची भावना ही रामदास शास्ञी चाकूरकर हे व्यक्त करतात.

चाकूर येथे १८१० ते १८७५ या कालावधीत विठ्ठल शास्ञी महाराज उपाख्य विष्णवानंद सरस्वती स्वामी महाराज हे संत होऊन गेले. त्यांनी भागवत संहिता वाचन परंपरा आणि नारदीय किर्तन परंपरा पाळली.
मराठी साहित्यातील मध्ये वामन पंडित, मोरोपंत, रघुनाथ पंडित यांच्यासोबत संत चुडामणी सुत विठ्ठल शास्त्री महाराज यांचे नाव पंत कवींच्या संदर्भात घेतले जाते. विठ्ठल शास्त्री यांचे काव्य हे पंत काव्य, तंत काव्य आणि संत काव्य या तीन प्रकारात मोडणारे आहे.

या घराण्यात जन्माला आलेले रामदास भानुदास शास्ञी चाकूरकर यांनी १९८४ मध्ये विद्युत पदविका घेतली. १० वर्ष औद्योगिक क्षेत्रात काम केले . जपान येथे प्रशिक्षण घेतले व तब्बल २२ वर्षे वैद्यकीय क्षेत्रात उपकरणांची विक्री व दुरुस्तीचे काम केले.
*२०० वर्षांची नित्य भागवत संहिता वाचन परंपरा*
शास्त्री ज्यांच्या मठामध्ये २०० वर्षांपासूनची नित्य भागवत संहिता वाचन परंपरा सुरू आहे. भागवत संहिता वाचन परंपरा वडीलांच्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे रामदास शास्ञी यांनी पत्करली. केवळ रामरक्षा पठणा पुरताच रामदास शास्ञी यांचा संबंध आलेला होता. भागवत संहिता वाचन कसं जमणार हा मुख्य प्रश्न होता. बाहेरून कोणी भागवतकार यायला तयार नव्हता. शेवटी वडीलांनी आदेश दिला तुच भागवत संहिता वाचन कर व भागवत सांग. तब्बल एक महिना भागवत कथा सांगण्याचे काम त्यांनी केले.
विठ्ठल शास्त्री महाराज यांनी लिहिलेली २५ आख्याने असणारी वही वडीलांनी हातात दिली व नारदीय किर्तन परंपरा पुढे चालवावी असे सांगितले.

विठ्ठल शास्त्री महाराजांच्या साहित्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी रामदास शास्ञी यांनी ही नारदीय किर्तन परंपरा पुढे सुरू केली. फक्त कधी तरी किर्तन ऐकलेले व हिंदी , मराठी गाणी ऐकलेली एवढाच संगीताचा संबंध आलेला होता. ना किर्तनाचे शिक्षण घेतलेले ना संगिताचे धडे गिरवलेले. परंतु थेट गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त परभणी येथे गालव्य आख्यानावर पहिले नारदीय किर्तन केले आणि ही परंपरा पुढे चालू झाली. श्री क्षेत्र पंढरपूर, शिर्डी, औंढा नागनाथ, सज्जनगड, श्री क्षेत्र गोंदवले, पुणे येथील १४१ वर्षांची जुनी संस्था असलेल्या नारद मंदिरात, भारतीय किर्तन संस्था दादर, श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर, श्री शंकराचार्य करवीर पीठ अशा ठिकाणी किर्तन सेवा करता आली.
२७ अक्टोंबर २०२५ रोजी श्री विठ्ठल शास्त्री महाराज यांची १५१ वी पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्या पुर्वी १५० ठिकाणी नारदीय किर्तन करण्याचा संकल्प रामदास शास्ञी चाकूरकर यांनी केला होता. १५१ वे किर्तन उत्सवाच्या काळात करण्याचा संकल्प केला व तो सिध्दीस जात आहे.
रामदास शास्ञी चाकूरकर यांनी परभणी येथील आकाशवाणी केंद्रावर १२ भागांमध्ये भागवत कथा सांगितली. पंत कवी विठ्ठल शास्त्री महाराजांच्या साहित्याची ओळख यावर १० भागांमध्ये माहिती दिली. २०२५ मध्ये झालेल्या किर्तन संमेलनातही त्यांना किर्तन सेवा करण्याचा मान मिळाला व त्यांना किर्तन भुषण ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
