
लातूर | दि. १३ मार्च २०२६
ग्रामीण महिलांचा सर्वांगीण विकास, कौशल्यवृद्धी आणि सूक्ष्म उद्योजकतेतून आर्थिक सक्षमीकरण या उद्देशाने मौजे दर्जी बोरगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष निवासी शिबिराच्या निमित्ताने महिला मेळाव्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. एडिएम ॲग्रो, लातूर आणि कृषि महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात महिला सक्षमीकरणाच्या विविध पैलूंवर सखोल विचारमंथन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी “नारी हीच नारायणी आहे” असे प्रतिपादन करत महिलांच्या सामर्थ्याचा गौरव केला. अध्यक्षस्थानी दर्जी बोरगाव येथील महिला बचत गटाच्या सौ. मुक्ताताई माने होत्या. मार्गदर्शक म्हणून हराळी येथील कृषि तंत्र विद्यालयाच्या प्राचार्या सौ. गौरी कापरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश दादा, सौ. मंगला कुलकर्णी, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. ज्योती देशमुख आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. अनिलकुमार कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. त्यानंतर कु. वैष्णवी हिरे व कु. सानिका मोरे यांनी सादर केलेल्या मंजुळ स्वागतगीताने वातावरण भारावून गेले.
उद्घाटक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी आपल्या मार्गदर्शनात राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ औपचारिक उपक्रम नसून समाजहितासाठी नवा मार्ग शोधण्याची प्रेरणादायी प्रक्रिया असल्याचे सांगितले. त्यांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांच्या तीस वर्षांच्या लोककल्याणकारी आणि मुत्सद्दी राज्यकारभारातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. अहिल्यादेवींनी स्वतःचा खजिना प्रजेच्या कल्याणासाठी खर्च करून निस्वार्थ सेवेचा आदर्श घालून दिला, असे त्यांनी नमूद केले. महिलांनी घर सांभाळतानाच वेळ आल्यास देशरक्षणाची जबाबदारीही समर्थपणे पार पाडली आहे, त्यामुळेच “नारी हीच नारायणी आहे,” असे ते म्हणाले.

मार्गदर्शक म्हणून बोलताना सौ. गौरी कापरे यांनी विशेष निवासी शिबिर हे केवळ सामाजिक कार्यापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व घडणीची ‘संस्कारांची शाळा’ असल्याचे सांगितले. त्यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या दूरदृष्टी, मुत्सद्देगिरी आणि कुशल नेतृत्वाचा उल्लेख करत त्यांच्या जीवनकार्याचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवण्याचे आवाहन केले.
यावेळी स्नेहल बावले हिने स्त्रियांच्या आर्थिक सक्षमीकरणावर आपले विचार मांडले, तर विशाल सोनवणे याने ग्रामीण भागातील विविध समस्यांवर उहापोह केला.
अध्यक्षीय समारोपात सौ. मुक्ताताई माने यांनी महिलांना बचतीचे महत्त्व पटवून देत बचत हीच आत्मनिर्भरतेची गुरुकिल्ली असल्याचा मोलाचा सल्ला दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. आदिती आचार्य हिने केले. प्रास्ताविक डॉ. ज्योती देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन समीक्षा देशमुख हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. नितीन तांबोळी, डॉ. ज्ञानेश्वर सुरडकर, दशरथ सुरवसे, उत्तम पवार, दीपक जाधव, पल्लवी बनसोडे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक-स्वयंसेविका यांचे सहकार्य लाभले.
या महिला मेळाव्यास शेतकरी, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देणारा हा कार्यक्रम ग्रामीण समाजजीवनात नवी प्रेरणा निर्माण करणारा ठरला.
