
माणूस प्रतिष्ठान लातूर द्वारा संचालित माझं घर या प्रकल्पातील मुलांना सोबत घेऊन या प्रकल्पाचे संस्थापक अध्यक्ष शरद झरे यांनी लातूर जिल्ह्यातील ९ तालुक्यातील सर्व तालुका ठिकाणे तसेच प्रवासाच्या मार्गावर येणाऱ्या गावांना भेटी देऊन प्लास्टिक तसेच फटाक्यांचे दुष्परिणाम या विषयी जनजागृती केली. ४० गावांनी २०२६ ची दिवाळी फटाका मुक्त करण्याचा संकल्प करून या चिमुकल्या मुलांचे अनुकरण करण्याचे वचन दिले. तसेच प्लास्टिकचा वापर मर्यादित करून प्लास्टिक गावात कुठेही टाकणार नसल्याचे अभिवचन ही यावेळी दिले.

माझं घर प्रकल्पात शरद झरे हे गेली ७ वर्षांपासून फटाका मुक्त दिवाळी साजरी करतात. प्लास्टिक वापरू नये यासाठी कापडी पिशवींचे वाटपही त्यांनी केले आहे.
फटाका मुक्त दिवाळी, प्लास्टिक मुक्त परिसर, पर्यावरण संवर्धन, वृक्ष लागवड आणि त्याचे संगोपन ही संकल्पना घेऊन ही सायकल संवाद याञा लातूर जिल्ह्यात काढण्यात आली. प्लास्टिक मुक्त लातूर अभियान, फटाके मुक्त दिवाळी, पर्यावरणीय जीवनशैलीच्या अंगीकारासाठी जनजागृती करणे हा या सायकल संवाद याञेचा मुख्य हेतू होता.
केवळ जनजागृती न करता या निमित्ताने औसा येथील भुईकोट किल्ला, खरोसा लेणी परिसर, हत्ती बेट, उदगीर चा किल्ला या परिसरात स्वच्छतेची प्रत्यक्ष कृती करुन परिसरातील प्लास्टिक जमा करत येथील स्वच्छता ही करण्यात आली. या सायकल संवाद याञेमधून ९ तालुक्यातील १०० गावांना भेटी दिल्या, या सर्वांची मोठी उपलब्धी म्हणजे तब्बल ४० गावांचा प्लास्टिक मुक्त गाव तसेच फटाका मुक्त दिवाळी २०२६ चा संकल्प करुन घेण्यात आला. या फटाके मुक्त गावांमध्ये फटाक्यांच्या वाचवलेल्या पैशातून गावात बाल वाचनालय उभारण्याचे ठरले. ज्या मुळे लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होईल.
लातूर जिल्ह्यातील ९ तालुक्यातून सलग ७ दिवसांत ५३० कि.मी. चा सायकल प्रवास या निमित्ताने करण्यात आला. या सायकल संवाद यात्रेत १२ मुलांचा ही सहभाग होता, यामध्ये १० वर्षाचा तनिष झित्रे ही सहभागी होता. यानंतर दरवर्षी जिल्ह्यातून सायकल यात्रा काढण्याचा संकल्प करण्यात आला आहे. लातूर शहरातून महिनाभरात किमान एक प्लास्टिक मुक्त शहरासाठी सायकल फेरी काढण्यात येण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यातून सायकल स्वारांचा ग्रुप ही तयार केला जाणार आहे. ज्यामुळे ही संकल्पना जिल्हाभरात राबवली जाईल.

