अभय मिरजकर

लातूर जिल्ह्यात सोयाबीन, तूर, ऊस, हरभरा, ज्वारी, गहू अशा पिकांचे क्षेत्र अधिक आहे. क्वचित काही शेतकरी वेगवेगळे प्रयोग करताना दिसतात. चाकूर येथील विक्रम अशोकराव पांडे (चाकूरकर) यांनी महाबीजच्या माध्यमातून तीन एकर क्षेत्रावर ( टी ए एम १०८ या ) नवीन मोहरीच्या वाणांची पेरणी करून लातूर जिल्ह्यात एक वेगळी वाट निवडली आहे.
पारंपारिक पध्दतीने शेती करणारे शेतकरी केवळ स्वतःच्या कुटुंबासाठी खाण्यासाठी शेतात मोहरी, तीळ,भगर ,राळ, भुईमूग, कांदा, लसण,मिरची, धने अशी वाण घेत असतात. लातूर जिल्ह्यात सर्वाधिक पिकाचे क्षेत्र आहे ते सोयाबीनचे. देशातील दुसऱ्या क्रमांकाचा आणि महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचा सोयाबीन उत्पादक जिल्हा म्हणून लातूरची ओळख आहे. लातूर जिल्ह्यात ऊस, तूर, हरभरा, ज्वारी, गहू अशी पिके शेतकरी घेत असतात. उत्तरेकडील राज्यात तेलासाठी मोहरीचे उत्पादन घेतले जाते. परंतु महाराष्ट्रात मोहरीचे उत्पादन अधिक घेतले ही जात नाही आणि मोहरीचे तेल खाण्यासाठी वापरलेही जात नाही.
महाबीजच्या माध्यमातून चाकूर येथील विक्रम अशोकराव पांडे (चाकूरकर) यांनी चक्क तीन एकर क्षेत्रावर नवीन मोहरीच्या वाणाची पेरणी केली आहे. या संदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले की, पट्टा पद्धतीने चार फुटांचे अंतर ठेऊन तीन तासांची पेरणी करण्यात आली.

नोव्हेंबर मध्ये पेरणी करण्यात आली त्यासाठी दिड किलो (टी.ए.एम.१०८ वाण) बीयाणे लागले. एकरी ५ ते ७ क्विंटल उत्पादन मिळेल असा अंदाज आहे. २३०० रुपये बियाणे खर्च, पेरणीसाठी ३ हजार रुपये , तीन फवारण्या साठी ६ हजारांचा खर्च आला. फंगीसाईड, ट्रायकोडार्मा, फाॅलिक्युअर , मावा साठी रोगर आणि निम अर्क १३६०० पी.पी.एम. ची फवारणी केली. खुरपणी साठी १० हजार रुपयांचा खर्च झाला. काढणीसाठी १० हजारांचा खर्च येईल. म्हणजे एकूण खर्च ३२ हजार रुपयांच्या आसपास झालेला आहे. साधारण एकरी ५ क्विंटल उत्पादन अपेक्षित धरलेले आहे. १५ क्विंटल उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. साधारणपणे १० हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला तरी दिड लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. ९५ दिवसांत मोहरीचे उत्पादन निघते साधारणपणे एक लाख वीस हजार रुपयांचा नफा मिळतो. या साठी कोणतेही रासायनिक खत वापरलेले नाही.

