
जवाहर नवोदय विद्यालय, लातूर येथील विद्यार्थिनी कु. अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासासंदर्भात पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक अनमोल तांबे यांनी तपासाबाबत महत्त्वाची व संवेदनशील माहिती माध्यमांना दिली.
पोलीस अधीक्षक अनमोल तांबे यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास अधिक प्रभावी, पारदर्शक व निष्पक्ष व्हावा यासाठी विशेष तपास पथक (SIT) नियुक्त करण्यात आले आहे. या SIT चे नेतृत्व नांदेड येथील महिला उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) अर्चना पाटील करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
हा प्रकार केवळ आत्महत्येचा नसून, तपासादरम्यान जर खुनाचा निष्कर्ष समोर आला, तर संबंधित गुन्ह्यात तात्काळ कठोर कलमे वाढवण्यात येतील, असेही पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले. “या प्रकरणाबाबत आम्ही अत्यंत गंभीर आहोत आणि तपास योग्य दिशेनेच सुरू आहे,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, ४ जानेवारी रोजी घटना घडल्यापासून लातूर पोलीस प्रत्येक बाबीचा सखोल तपास करत आहेत. आतापर्यंत मिळालेल्या तपासात विद्यार्थिनीला काही कारणांवरून अपमानित करण्यात आल्याचे, तसेच तिला एका गोष्टीसाठी मानसिक दबाव आणण्यात आल्याचे मुद्दे समोर आले आहेत. या संदर्भात सबळ पुरावे हाती लागले असून, त्याच आधारे पुढील तपास केला जात आहे, असेही त्यांनी नमूद केले.
विद्यालयातील वातावरण, संबंधित व्यक्तींची भूमिका, मानसिक छळाचे प्रकार, तसेच तांत्रिक व वैद्यकीय पुरावे या सर्व बाबी SIT कडून तपासल्या जात असून, कोणतीही बाब दुर्लक्षित केली जाणार नाही, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला.
दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून, दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक, विद्यार्थी आणि विविध सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.

