

महाराष्ट्र ही केवळ भौगोलिक ओळख नाही, तर तो एका वैचारिक प्रवाहाचा वारसा आहे. संत परंपरेपासून फुले–शाहू–आंबेडकरांपर्यंत समाजसुधारणेचा जो प्रवाह वाहत आला, त्याने महाराष्ट्राला पुरोगामी विचारांची प्रयोगशाळा बनवले. या प्रवाहात मराठवाड्याचे स्थान वेगळे, संघर्षपूर्ण आणि तरीही तेजस्वी राहिले आहे. निजामशाहीचा अन्याय, सामाजिक मागासलेपणाची बेडी आणि शैक्षणिक वंचना यामधून वाट काढत मराठवाड्याने स्वतःची ओळख घडवली. त्याच मराठवाड्याच्या हृदयात वसलेले लातूर हे शहर आज पुन्हा एकदा इतिहासाच्या वळणावर उभे आहे.
लातूरची ओळख केवळ भूकंप, दुष्काळ किंवा राजकीय चढउतारांपुरती मर्यादित नाही. हे शहर विचारांचे, संघर्षांचे आणि सामाजिक परिवर्तनाचे केंद्र राहिले आहे. याच भूमीतून विलासराव देशमुखांसारख्या दूरदृष्टीच्या नेत्याने राज्याला दिशा दिली. प्रशासनात माणुसकी, राजकारणात समतोल आणि सत्तेत संवेदनशीलता ही त्यांची ओळख होती. त्यांच्या विचारांची पुण्याई आजही लातूरच्या राजकीय निर्णयांमध्ये जाणवते.
महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा गाभा म्हणजे समता, सामाजिक न्याय आणि प्रतिनिधित्व. हाच विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून आणि सामाजिक चळवळीतून देशाला दिला. बाबासाहेबांचा हा वारसा मराठवाड्यात केवळ ग्रंथांत नाही, तर जनमानसात खोलवर रुजलेला आहे. त्यामुळेच दलित, वंचित आणि अल्पसंख्यांक समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा प्रश्न येथे अधिक तीव्रतेने समोर येतो.
लातूर महानगरपालिकेच्या अलीकडच्या निवडणुकीत जे घडले, ते केवळ राजकीय गणित नव्हते, तर इतिहासाशी संवाद साधणारे पाऊल होते. आमदार, माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्यावर काँग्रेसने मराठवाड्याची जबाबदारी सोपवली. वेळ कमी, जबाबदारी मोठी आणि अपेक्षा प्रचंड असताना त्यांनी लातूरच्या सामाजिक रचनेचे अचूक वाचन केले. अल्पसंख्यांक बहुल शहर, दलित मतदारांची निर्णायक संख्या आणि बदलत्या राजकीय मानसिकतेचा समतोल साधत त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत आघाडीचा निर्णय घेतला.
हा निर्णय म्हणजे राजकीय धाडस होते आणि वैचारिक स्पष्टतेचे प्रतीकही. परिणामी लातूर महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेमी १३ दलित नगरसेवक एकत्रितपणे निवडून आले. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे चार नगरसेवक थेट बाळासाहेब आंबेडकरांचे सैनिक म्हणून सभागृहात पोहोचले, तर उर्वरित काँग्रेसच्या माध्यमातून प्रतिनिधित्व मिळाले. हा विजय केवळ व्यक्तींचा नव्हता, तर विचारांचा, सामाजिक न्यायाचा आणि समतेच्या आग्रहाचा होता.
लातूर, मुंबई आणि नांदेड येथे झालेल्या काँग्रेस–वंचित आघाडीचा सर्वाधिक सकारात्मक परिणाम लातूरमध्ये दिसून आला, हे विशेष. यामागे लातूरच्या मतदारांची वैचारिक प्रगल्भता आणि इतिहासाची जाणीव आहे. म्हणूनच लातूरकर आज म्हणतात की, हा चमत्कार केवळ राजकीय योगायोग नाही; तो विलासराव देशमुखांच्या विचारसंपदेचा आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या करिश्माई नेतृत्वाचा संगम आहे.
महाराष्ट्राचा पुरोगामी विचार जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर प्रत्यक्षात उतरतो, तेव्हा लोकशाही अधिक बळकट होते. लातूर महानगरपालिका हे त्याचे ताजे उदाहरण आहे. इतिहास, विचार आणि वर्तमान यांचा हा संगम लातूरला केवळ शहर म्हणून नव्हे, तर पुरोगामी महाराष्ट्राच्या चालत्या-बोलत्या प्रतिमेप्रमाणे उभे करतो.

