लातूर | प्रतिनिधी :
लातूर शहरातील दिवसेंदिवस तीव्र होत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येने नागरिकांचा जीव अक्षरशः हैराण झाला असताना आता प्रशासनाने या प्रश्नावर ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी निर्णायक पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. ११ मार्च २०२६ रोजी लातूर महानगरपालिकेत झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत शहरातील वाहतूक व्यवस्थेचा सखोल आढावा घेत विविध कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ही बैठक पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि महापालिका आयुक्त मानसी मीना यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती. बैठकीस महापौर जयश्री सोनकांबळे, उपमहापौर स्नेहल उटगे, विरोधी पक्षनेते देविदास काळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वाहतूक कोंडीचे वाढते संकट
लातूर शहरात गेल्या काही वर्षांत वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यातच रस्त्यांवरील अनियंत्रित पार्किंग, चौकांमधील अव्यवस्थित वाहतूक, अतिक्रमणे, रिक्षांचे मनमानी थांबे आणि वाहतूक शिस्तीचा अभाव यामुळे शहरातील अनेक मुख्य रस्ते आणि चौक कायमच कोंडीत अडकलेले दिसतात.
राजीव गांधी चौक, शिवाजी चौक, गांधी चौक, पीव्हीआर चौक, मार्केट परिसर अशा अनेक ठिकाणी सकाळ-संध्याकाळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने नागरिकांचा वेळ व इंधन वाया जात असून अपघातांचाही धोका वाढत आहे.
ट्राफिक वॉर्डनची नियुक्ती
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावी करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत किमान १०० ट्राफिक वॉर्डन नियुक्त करण्याचा प्रस्ताव मांडला. हे वॉर्डन शहरातील प्रमुख चौकांमध्ये पोलिसांसोबत काम करून वाहतूक सुरळीत ठेवतील आणि नियमभंग करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात मदत करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत सुचविण्यात आलेल्या महत्त्वाच्या उपाययोजना
बैठकीत वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक कठोर आणि व्यापक उपाययोजना सुचविण्यात आल्या.
- प्रत्येक चौकापासून ५० मीटरपर्यंत नो-पार्किंग झोन जाहीर करणे
- चौकांजवळ ऑटो रिक्षा पॉईंट व बस थांबे निश्चित करणे
- फक्त परवानाधारक ऑटो रिक्षांनाच रस्त्यावर चालण्याची परवानगी
- पोलीस व महानगरपालिकेच्या टोइंग व्हॅनद्वारे बेकायदेशीर पार्किंगवर कारवाई
- शहरातील ट्राफिक सिग्नल व सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करणे
- झेब्रा क्रॉसिंग, नो-पार्किंग फलक व वाहतूक चिन्हांचे नूतनीकरण
- वाहतूक सुधारण्यासाठी विशेष वर्किंग कमिटी स्थापन करणे
- काही प्रमुख रस्त्यांवर वन-वे वाहतूक व्यवस्था लागू करण्याचा अभ्यास
- चौकांमध्ये फ्री लेफ्ट टर्नची संकल्पना राबविण्याचे नियोजन
- दुकानदार व वाहनधारकांच्या अतिक्रमणांवर कठोर कारवाई
- रस्त्यांवरील अनधिकृत साईनबोर्ड, फ्लेक्स व जाहिराती हटविणे
- मुख्य चौकांमध्ये एसटी बस थांबवून प्रवासी घेण्यावर बंदी
- रस्त्यांच्या मध्यभागी असलेल्या अडथळ्यांचे नियोजनबद्ध हटवणे
- पीव्हीआर चौक येथे पायलट प्रोजेक्ट राबविणे
- सिटी बस सेवा अधिक प्रभावी करणे
- राजीव गांधी चौकाजवळ राष्ट्रीय महामार्गावर भरत असलेल्या भाजी मार्केटचे नियोजन
पीव्हीआर चौकातून होणार सुरुवात
बैठकीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी तातडीने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी १२ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजता पीव्हीआर चौक येथे प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे.
या पाहणीदरम्यान वाहतुकीची प्रत्यक्ष परिस्थिती, अडथळे आणि संभाव्य उपायांचा अभ्यास करून जागेवरच कायमस्वरूपी उपाययोजना निश्चित केल्या जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
निर्णयांची अंमलबजावणी महत्त्वाची
वाहतूक कोंडीवर उपाययोजनांबाबत यापूर्वीही अनेक बैठका आणि योजना जाहीर झाल्या; मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीअभावी समस्या कायम राहिली. त्यामुळे या बैठकीतील निर्णय कागदावरच न राहता कठोरपणे राबविले गेले तरच लातूरकरांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
