अभय मिरजकर , लातूर

जिद्द असेल तर मार्ग सापडतो” आणि “कष्टाविना फळ नाही”या म्हणी आपण नेहमी ऐकतो, पण या म्हणींना आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष उतरवणारे व्यक्तिमत्व म्हणजे श्री नरहर मुदगलराव जोशी चाकूरकर. ८ डिसेंबर १९३७ रोजी सुपा (ता. गंगाखेड) येथे जन्मलेल्या नरहररावांचा जीवनप्रवास म्हणजे संघर्षातून यशाकडे, कलेकडून संस्कृतीकडे आणि प्रपंचाकडून परमार्थाकडे झालेला एक थक्क करणारा प्रवास आहे.
वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी पितृछत्र हरवलेल्या नरहररावांसमोर आभाळ फाटले होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी परभणी, चाकूर आणि उदगीर येथे शिक्षण घेतले. कधी माधुकरी मागून तर कधी वार लावून त्यांनी आपला उदरनिर्वाह केला. शिक्षणाची तळमळ पाहून उदगीर येथे वैद्यकीय अधिकारी असलेल्या बाळकृष्ण देशपांडे यांनी त्यांना आपल्या घरी ठेवून घेतले.

म्हणतात ना, “खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे”. त्यांच्या जन्मांध आईच्या सुरेल आवाजातून आणि मामांच्या संस्कारातून त्यांच्यावर संगीताचे पहिले बीजारोपण झाले.
संगीताला त्यांनी आपला ‘आत्मा’ मानले. संगीताचे अधिकृत शिक्षण न घेताही त्यांनी बासरी वादन आत्मसात केले. केवळ बासरीच नव्हे, तर हार्मोनियम, तबला, बुलबुल तरंग आणि दिमडी ही वाद्येही ते लीलया वाजवू लागले. त्यांच्याकडे २५ विविध प्रकारच्या बासऱ्यांचा दुर्मिळ संग्रह आहे. संगीताची ओढ इतकी की शास्त्रीय संगीत ऐकण्यासाठी ते खास पुण्यात जात असत. त्यांच्या संग्रहात १,००० हून अधिक कॅसेट्स आणि ५५० पेक्षा जास्त सीडी आहेत . अहमदपूर येथे ‘साहित्य संगीत कला अकादमी’ स्थापन करून त्यांनी सलग ७ वर्षे कोजागिरी संगीत उत्सव साजरा केला आणि ग्रामीण भागात कलेची ज्योत पेटवली.

“विद्येविना मती गेली…” या उक्तीचे महत्त्व ओळखून त्यांनी डी.एड., बी.एड., एम.एड. आणि एम.ए. मराठीची पदवी संपादन केली. विशेष म्हणजे, सेवानिवृत्त झाल्यावर वयाच्या उत्तरार्धात त्यांनी इतिहास विषयात एम.ए. केले. परीक्षेत जेव्हा परीक्षकांनी त्यांना ‘पालक’ समजून बाहेर जाण्यास सांगितले, तेव्हा त्यांनी “मीच परीक्षार्थी आहे”असे सांगत सर्वांना थक्क केले. गुणपत्रिका देताना प्राचार्यांच्या हस्ते त्यांचा खास सत्कार करण्यात आला.
‘मुख्याध्यापक’ म्हणून लोदगा ता. औसा येथे कार्य करताना त्यांनी आपल्या केंद्राला तालुक्यात प्रथम क्रमांकावर नेले. १९९१ मध्ये जनगणनेच्या त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रपतींच्या ‘रजत पदकाने’ सन्मानित करण्यात आले. १७ वर्षे त्यांनी अध्यापक विद्यालयात अधिव्याख्याता म्हणून काम केले. औसा तालुक्यातील लोदगा, धाराशिव, परंडा, अहमदपूर येथे ज्ञानदानाचे काम केले.

नरहरराव केवळ पुस्तकी कीडा नव्हते. “निरोगी शरीरात निरोगी मन वसते” यावर त्यांचा ठाम विश्वास होता. बॅडमिंटन, शटल कॉक, टेबल टेनिस, कॅरम आणि व्हॉलीबॉल अशा विविध खेळांत त्यांनी प्राविण्य मिळवले. स्वतः खेळत असतानाच इतरांनाही प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी अनेक क्रीडा स्पर्धांचे आयोजनही केले.
*जिज्ञासेचा खजिना:
१०८ चिकाटबुकांचा संग्रह*
“वाचाल तर वाचाल” या म्हणीला त्यांनी नवा अर्थ दिला. ज्ञान जेथे मिळेल तिथून ते गोळा करण्यासाठी त्यांनी ‘चिकटबुक’ (Scrapbook) उपक्रम राबवला. त्यांच्याकडे आज तब्बल १०८ पेक्षा जास्त चिकटबुके आहेत. यामध्ये अध्यात्म, विज्ञान, पाककला, साहित्य, औषधी वनस्पतींपासून ते मराठीच्या ९६ लोकभाषांपर्यंतचा दुर्मिळ ज्ञानाचा ठेवा संग्रहित आहे. हा संग्रह म्हणजे एखाद्या चालत्या-बोलत्या विश्वकोशासारखाच आहे.
मराठी सह विविध प्रकारच्या ग्रंथांचा संग्रह, पोथ्या, पुराण यांचा संग्रह त्यांनी निर्माण केला. टाकाऊतून टिकाऊ ही संकल्पना त्यांनी स्वतः राबवली. आपल्या संग्रहातील ७०० पेक्षा अधिक ग्रंथ, पुस्तके त्यांनी आकर्षक पध्दतीने सजवली . त्यासाठी घरी आलेल्या लग्न पञिका, चहा, बिस्किटे यांचे प्लास्टिक, चाॅकलेटचे वरचे पेपर वापरले.
*अध्यात्मिक साधना आणि भाषेचे पावित्र्य*

प.पू. गुळवणी महाराजांकडून शक्तीपात दीक्षा घेतली . गुरुबंधू दत्त कविश्वर यांच्या कडून योगसाधना शिकली. इंचगिरी संप्रदायाचे मल्लेश्वर महाराज यांच्याशी संपर्क आला . उन्हाळ्यातील सुट्टी, दिवाळी सुट्टी आणि श्रावण महिन्यातील सुट्टी घेऊन
त्यांनी सज्जनगड, केदारनाथ, बद्रीनाथ, जोशीमठ, रामकृष्ण परमहंस मठ, विवेकानंद स्मारक कन्याकुमारी, येल्लोरी अशा विविध ठिकाणी २१ -२१ दिवसांची खडतर साधना केली.
१९७९ मध्ये बार्शीत अध्यात्म आश्रमाची स्थापना केली. गुरुंच्या आदेशानुसार सदगुरू म्हणून अनेकांना नाम दिक्षा देण्याचे काम त्यांनी केले.
मराठी भाषेबद्दल त्यांना सार्थ अभिमान आहे. “माझ्या मराठीची बोलु कौतुकें…” ही ओळ सार्थ ठरवत त्यांनी आरत्या, मंत्र आणि श्लोकांचे उच्चारण शास्त्रोक्त पद्धतीचा आग्रह धरला आणि त्याचे प्रशिक्षणही दिले.
आज वयाच्या ९० व्या वर्षीही नरहरराव कोणावरही विसंबून नाहीत. “म्हातारा इथं कोण आहे?”असा प्रश्न पडेल इतका त्यांचा उत्साह आहे. चष्म्याशिवाय मोबाईल वापरणे आणि वाॅट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून जगाशी जोडून राहणे, ही त्यांच्या प्रगत विचारांची पावतीच आहे. आजही ते या माध्यमातून मार्गदर्शन करत असतात.
गदिमांच्या ओळींप्रमाणे- “तुझे आहे तुजपाशी … नरहररावांनी स्वतःमध्ये दडलेल्या अनेक कलांना जागृत केले आणि जोपासले. शून्यातून विश्व निर्माण करून त्यांनी स्वतःला एक आदर्श शिक्षक, कुशल खेळाडू, संवेदनशील गायक आणि निष्ठावान साधक म्हणून सिद्ध केले आहे. त्यांचे हे जीवनकार्य येणाऱ्या अनेक पिढयांसाठी एक प्रेरणादायी दीपस्तंभ आहे. “मूर्ती लहान पण कीर्ती महान”अशा या व्यक्तिमत्वास मानाचा मुजरा !

