निष्ठावंत कार्यकर्त्यांचा बळी आणि पुतण्यांचा उद्धार —
संजय बनसोडेंच्या राजकारणाचा पूर्व भागातला पहिलाच धक्का…!

लातूर | प्रतिनिधी
“बळी तो कान पिळी” ही म्हण राजकारणात सर्वश्रुत आहे. तळे राखणारा पाणी पिणार, हेही मान्य. मात्र गरिबीतून संघर्ष करत मोठ्या पदावर पोहोचलेल्या नेत्याने गरिबीची, कष्टाची आणि निष्ठेची जाणीव ठेवावी, ही अपेक्षा असते. पण तीच अपेक्षा संजय बनसोडे यांच्या बाबतीत फोल ठरताना दिसते आहे.
लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेससाठी पोषक असलेल्या पूर्व भागातच निष्ठावंत सामान्य कार्यकर्त्यांचा पहिला बळी घेतला गेला असून तो बळी खुद्द माजी मंत्री संजय बनसोडेंनी घेतला आहे, अशी तीव्र चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
प्रभाग ३ : निष्ठा बाजूला, नातेसंबंध पुढे
प्रभाग क्रमांक ३ मध्ये गेली १५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करणारे, निवडणुकीची तयारी करणारे आणि संजय बनसोडेंचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे राहुल बनसोडे यांना थेट डावलण्यात आले.
त्याऐवजी पुतणे मयूर बनसोडे आणि नुकतेच काँग्रेसमधून आलेले, संजय बनसोडेंचे आर्थिक व्यवहार पाहणारे राम चलवाड यांना झुकते माप देण्यात आले.
राजकीय निष्ठेपेक्षा नातेसंबंध आणि व्यवहारिक जवळीक अधिक महत्त्वाची ठरते आहे, हे यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
आरक्षण असूनही न्याय नाही
प्रभाग ३ मध्ये
- एससी महिला
- ओबीसी पुरुष
- खुला पुरुष
- खुली महिला
अशी आरक्षण रचना असताना, खुल्या प्रवर्गातून राहुल बनसोडे यांना उमेदवारी देऊन सामान्य कार्यकर्त्यांना सकारात्मक संदेश देता आला असता.
इतकेच नव्हे तर तडजोड म्हणून त्यांच्या पत्नी रेखा बनसोडे यांचीही उमेदवारी मागण्यात आली होती.
मात्र त्या दोन्ही शक्यता धुडकावून लावत, घरातीलच उमेदवारांना पुढे रेटण्यात आले.
बाहेरून आलेल्यांना रेड कार्पेट
काल शिवसेनेतून सुनील बसपुरे आणि बालाजी जाधव यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. जातीय व प्रवर्गीय गणित जुळवताना, नुकतेच पक्षात आलेले लोक पात्र ठरतात; पण १५ वर्षांचा निष्ठावंत कार्यकर्ता अपात्र ठरतो, हे कोणते राजकारण?
राम चलवाड हे काँग्रेसमधून आलेले असतानाही त्यांना उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. कारण ते नातेवाईक नाहीत तरी आर्थिकदृष्ट्या अत्यंत निकटचे आहेत, अशी उघड चर्चा आहे.
सामान्य कार्यकर्त्यांसाठी पक्ष आहे की घरासाठी?
संजय बनसोडे स्वतः सामान्य कार्यकर्त्यातून आमदार आणि मंत्री झाले. मग आज तेच प्रस्थापितांसारखे वागत असतील, घरातील पुतण्यांसाठी निष्ठावंतांचा बळी देत असतील, तर सामान्य कार्यकर्त्यांनी नेमके काय करायचे?
पक्षासाठी झटायचे?
की घराणेशाही मान्य करायची?
की मग राजकारण सोडून व्यवहार सांभाळायचा?
हा प्रश्न आज पूर्व भागातल्या प्रत्येक सामान्य राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या मनात उभा आहे.
न्याय भाषणात, अन्याय यादीत
“सामान्य कार्यकर्त्याला न्याय देऊ” ही घोषणा फक्त व्यासपीठापुरतीच आहे का?
निष्ठा, संघर्ष आणि पक्षासाठी दिलेली १५ वर्षे यांची किंमत शून्य ठरते का?
आज राहुल बनसोडे डावलले गेले; उद्या कोण?
हा प्रश्न फक्त एका व्यक्तीचा नाही, तर संपूर्ण पक्ष संघटनेच्या आत्म्याचा आहे.
घराणे शाही ठरेल धोक्याची घंटा…
लातूरच्या राजकारणात तिसऱ्या आघाडीच्या आगमनाने निवडणूक चुरशीची झाली असली, तरी स्वतःच्याच घरात निष्ठावंतांचा बळी देण्याची सुरुवात राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.
आज हा बळी पूर्व भागात गेला आहे.
उद्या त्याचे पडसाद संपूर्ण शहरात उमटले,
तर जबाबदारी कोणाची?

