अभय मिरजकर

मराठी साहित्यात विविध प्रकारांच्या साहित्याचा समावेश आहे. जसे की, कविता, कथा, निबंध, नाटक, तत्वज्ञान ,विवेचनात्मक साहित्य, आत्मचरित्र यामध्ये पण अनेक विभाग आहेत. या सर्व प्रकारांनी मराठी साहित्याला विविधतापूर्ण बनवले आहे आणि त्यामुळे वाचनाची एक समृद्ध अशी परंपरा तयार झाली आहे. आत्मचरित्र हे लेखकाच्या जीवनाचा अभ्यास आणि त्यांचे अनुभव या दृष्टीने पाहिले जाते.

खरे तर आत्मचरित्र म्हणजे संबंधित व्यक्ति किंवा लेखकाने स्वतःच्या जीवनाबद्दल, अनुभवांबद्दल, संघर्षांबद्दल आणि भावनांबद्दल लिहिलेलं लेखन. आत्मचरित्रामध्ये लेखक त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना, त्यांच्यावर झालेले प्रभाव, त्यांचे विचार, भावना, आणि अन्य व्यक्तींचा त्यांच्यावर असलेला प्रभाव याचे चित्रण असते.

लातूर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक भारत सातपुते यांनी ” जागरण ” हे आत्मचरित्र ९ एप्रिल २०२४ रोजी प्रकाशित केले. या संदर्भात माहिती देताना भारत सातपुते यांनी सांगितले की, जागरण ही आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे. आता जागरणची पाचवी आवृत्ती निघाली आहे. ऑनलाइन देखील जागरणची सहावी आवृत्ती बी एफ सी पब्लिकेशन लखनऊ उत्तर प्रदेश यांनी काढली आहे हे पुस्तक आता ॲमेझॉन ॲप वर देखील मिळते आहे . केवळ दोन वर्षांच्या आतच जागरणन ने हा टप्पा पार केला गेला आहे.
जागरण चे यश एवढ्यावरच थांबले नाही तर जागरणवरील ‘भारतपर्व’ हा समीक्षा ग्रंथ आहे. जो 26 जानेवारी २०२६ ला प्रसिद्ध झाला. जागरण वर आजपर्यंत २७५ पेक्षा अधिक समिक्षा , अभिप्राय आलेले आहेत. भारतपर्व या समिक्षा ग्रंथात २५० समीक्षा आहेत. ज्यातील दीडशेपेक्षा जास्त समीक्षा या देशभरातील विविध मराठी वृत्तपत्र, नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत.
सर्व क्षेत्रातील समीक्षकांनी जागरण वर लिहिले आहे. प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, मुख्याध्यापक ,डॉक्टर, इंजिनिअर ,शेतकरी, बँक, पोस्ट, कामगार , पञकार आदी क्षेत्रातून जागरणवर लेखन झाले आहे. महाराष्ट्रासह केरळ ,कर्नाटक, मध्यप्रदेश, गोवा, गुजरात अशा अनेक राज्यातून जागरणवर समीक्षा लिहिलेल्या आहेत. *जागरणचा हिंदी अनुवाद ‘जागर’ या नावाने प्रसिद्ध झाला आहे. इंग्रजी, कन्नड, गुजराती या भाषेतही लवकरच जागरण प्रसिद्ध होणार आहे. मराठी साहित्यातील 720 पानांचा हा भारतपर्व समीक्षा ग्रंथ कदाचित पहिलाच असावा. या शिवाय समिक्षेचा आणखी एक स्वतंत्र ग्रंथ काढावा लागणार आहे.
वाचन संस्कृती संपली अशी ओरड केली जाते पण त्या मध्ये तथ्य नाही हे जागरण ने सर्वांना दाखवून दिले आहे. शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांना जागरण हे प्रेरणादायी असल्याने खरंतर विद्यापीठ अथवा अभ्यासक्रम मंडळांनी या पुस्तकाची दखल घ्यायला हवी. आत्मचरित्र वाचनामुळे वाचकांना एक नवीन दृष्टिकोन मिळतो, तसेच लेखकाने त्यांच्या आयुष्यातील अनुभवांमधून काय शिकले हे समजून घेतले जाते. महाराष्ट्रात आत्मचरित्रातील लातूर पॅटर्न जागरण ने निर्माण केला आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

